उरण, प्रतिनिधी
नगरपरिषदेने शहरांतील वाहतूकीचा त्रास कमी व्हावा यासाठी नागाव-कामठा बायपास मार्ग तयार केला आहे. मात्र हा मार्ग महिलांसाठी धोकेदायक बनला आहे. या मार्ग दारूड्यांनी अड्डा बनविला असून, दिवसाढवळ्या देखील येथे दारूचे अड्डे बसलेले पहायला मिळत आहेत. यामुळे या मार्गवरून महिलांना घाबरून प्रवास करावा लागत आहे.

शहरातील रहदारी सुटसुटीत व्हावी यासाठी नगरपरिषदेने भिवंडीवला गार्डनचा काही भाग संपादित करून, कामठा ते द्रोणागिरी बाजार हा बायपास मार्ग तयार केला आहे. यामुळे नागाव मधून येणारी वाहतूक ही थेट कामठामार्गे बाहेर पडणायास मदत झाली आहे. सध्या हा मार्ग प्रवासासाठी डोकेदुखी झाला आहे. दारूड्यांनी हा मार्ग दारू पिण्यासाठीचा अड्डा बनविला आहे. येथील नाल्यालगत असणाऱ्या कठडयांवर दिवसा देखील हे दारूडे नशा करत असताना पहायला मिळत आहे. तर रात्रीच्या वेळेस हा मार्ग एखाद्या ओपन बार चे स्वरूप धारण करतो. यामुळे या मार्गवरून प्रवास करताना महिला वर्गाला घाबरून प्रवास करावा लागत आहे. तर नोकरदार महिला, विद्यार्थिनी या मार्गवरून ये-जा करताना स्वतःला असुरक्षित समजत आहेत. मागील वर्षभरापूर्वी आपलाबाजार परिसरातील हनुमान मंदिरामधील चोरलेली दानपेटी याच मार्गालगत असणाऱ्या नाल्यात टाकलेली सापडली होती. सोईसाठी बनवलेला हा मार्ग आता गैरसोईचा बनत आहे. यामुळे नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन यांनी याकडे गंभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
बातमी आवडली असल्यास शेअर आणि कमेंट नक्की करा…..