ओएनजीसी कंपनीतुन नाल्याद्वारे केमिकल सोडले; परिसरात उग्र वास

उरण, वैशाली कडू

ओएनजीसी कंपनीतून पिरवाडी हेलिपॅड येथील नाल्यातून केमिकल युक्त रसायन सोडले जात आहे. यामुळे परिसरात उग्र वास सुटला आहे, याचा त्रास या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना होताना दिसत आहे. याची कल्पना तहसीलदार उद्धव कदम यांना उरण तालुका मराठी पत्रकार संघाने दिली असता त्यांनी पहाणी करतो असे सांगितले.

गेली काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा परिस्थिती हाताळण्यात मग्न आहे. याचाच फायदा उठवीत ओएनजीसी कंपनीने केमिकलयुक्त रसायन पिरवाडी हेलिपॅड येथील नाल्यातून सोडले जात आहे. यामुळे आजूबाजूचा परिसर व पाणी काळे झाले आहे.
सोडण्यात आलेल्या केमिकल युक्त रसायनामुळे त्याचा परिणाम समुद्रातील माशांवर होण्याची शक्यता आहे. सदरचे दूषित मासळी खाल्यानंतर त्याचे दुष्परिणाम खाणाऱ्यावर झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल उपस्थित होत आहे. असे प्रकार या परिसरात वारंवार घडत असूनही प्रशासन व प्रदूषण मंडळ कोणतीच ठोस कारवाई करीत नसल्याचा फायदा कंपनीवाले घेत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. याबाबत या परिसरातील ग्रामपंचायत अथवा लोकप्रतिनिधी कंपनी विरोधात गप्प बसत असल्याने ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सदर घटनेची माहिती उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू व विरेश मोडखरकर यांनी तहसीलदार उद्धव कदम यांना देऊन याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page